भारतीय SaaS कंपन्या आता भरती करण्याऐवजी AI आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करत आहेत. वाढत्या महसुलासोबतच नफा (Profit Margins) वाढवण्यासाठी कंपन्या आता मानवी मनुष्यबळापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
भारतीय सॉफ्टवेअर-ॲज-अ-सर्व्हिस (SaaS) क्षेत्राचे बिझनेस मॉडेल आता एका मोठ्या परिवर्तनातून जात आहे. अनेक वर्षे या कंपन्या केवळ कर्मचाऱ्यांच्या संख्येवर आपल्या वाढीचा (Growth) अंदाज लावत होत्या, परंतु आता हे समीकरण बदलले आहे. आता महसूल वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही, हे सिद्ध करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे.
प्रति कर्मचारी महसूल वाढवण्यावर भर (Revenue per Employee)
गुंत्वणूकदारांची नजर आता एका महत्त्वाच्या मेट्रिकवर आहे, ती म्हणजे 'रेव्हेन्यू पर एम्प्लॉयी'. पूर्वी जास्त कर्मचारी म्हणजे मोठी कंपनी असे मानले जात असे, मात्र आता कमी खर्चात जास्त सेल्स (Sales) करणाऱ्या कंपन्यांना बाजारात जास्त पसंती मिळत आहे. कोड मेंटेनन्स, ऑटोमेटेड टेस्टिंग आणि कस्टमर सपोर्टसाठी AI चा वापर करून कंपन्या आपला नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नोकरीच्या बाजारपेठेत बदल
या धोरणामुळे नोकरीच्या बाजारपेठेत मोठी तफावत निर्माण झाली आहे. क्वालिटी ॲश्युरन्स (QA) आणि कस्टमर सपोर्टसारख्या एंट्री-लेव्हल पदांवरील भरतीमध्ये घसरण झाली आहे. कारण, जे काम मानवी टीम करत होती, ते काम आता स्वस्त दरात AI साधने करत आहेत. मात्र, जनरेटिव्ह AI, लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLM) आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील तज्ञांची मागणी अजूनही तेजीत आहे.
ऑपरेशनल आणि नियामक जोखीम (Regulatory Risks)
AI कडे वळण्याचे काही धोकेही आहेत. उदा. EU AI Act सारख्या कायद्यांमुळे कंपन्यांना आता नवीन अनुपालन नियमांचे (Compliance) पालन करावे लागेल, ज्यामुळे अतिरिक्त खर्च वाढू शकतो. तसेच, जर AI यंत्रणेत तांत्रिक त्रुटी आली, तर ग्राहकांचा विश्वास कमी होऊन कंपनीचे नुकसान होऊ शकते.
येणाऱ्या काही तिमाहींमध्ये, गुंतवणूकदारांनी या कंपन्यांचे ऑपरेटिंग मार्जिन्स आणि प्रति कर्मचारी वाढणारा महसूल यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
