केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी योजना (UDAN) ला FY 2035-36 पर्यंत आणखी एक दशकासाठी मुदतवाढ दिली आहे. यासाठी ₹28,840 कोटींच्या बजेटला मंजुरी मिळाली आहे. आता एअरलाइन्सना मिळणारी सबसिडी ३ वर्षांऐवजी ५ वर्षांसाठी दिली जाईल आणि सरकारी निधीतून १०० नवीन विमानतळ तसेच २०० हेलिपोर्ट्स उभारले जातील.
प्रादेशिक विमान प्रवासाला गती मिळणार
केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी योजना (UDAN) च्या पुढील टप्प्याला अधिकृत मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी एकूण ₹28,840 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. ही योजना FY 2026-27 पासून FY 2035-36 पर्यंत, म्हणजेच पुढील दहा वर्षांसाठी लागू राहील.
यापूर्वी एअर तिकीटांवर आकारल्या जाणाऱ्या लेव्हीमधून ही योजना चालवली जात होती. मात्र, आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला असून, हा संपूर्ण खर्च आता थेट सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे. या मोठ्या निधीचे नियोजन पायाभूत सुविधा आणि परिचालन स्थैर्य या दोन्हीसाठी केले आहे.
निधीचे नियोजन कसे?
- ₹12,159 कोटी: विमानतळांच्या विकासासाठी.
- ₹10,043 कोटी: व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) साठी, जेणेकरून कमी उत्पन्न असलेल्या प्रादेशिक मार्गांवर एअरलाइन्सना खर्च भागवण्यासाठी मदत मिळेल.
- ₹3,661 कोटी: 200 आधुनिक हेलिपोर्ट्सच्या विकासासाठी.
- ₹2,577 कोटी: चालू ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सपोर्टसाठी.
एअरलाइन्सना मोठा दिलासा
या योजनेतला एक महत्त्वाचा बदल म्हणजे एअरलाइन्सना मिळणाऱ्या सबसिडीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. आधी जिथे ३ वर्षांसाठी सबसिडी मिळत होती, तिथे आता ती पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे नवीन मार्गांना व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
गुंतवणूकदारांसाठी संधी, पण आव्हानेही
या घोषणेमुळे पायाभूत सुविधा विकासासाठी एक दीर्घकालीन रोडमॅप तयार झाला आहे. 100 नवीन विमानतळे आणि 200 हेलिपोर्ट्सच्या विकासामुळे बांधकाम आणि विमानतळ व्यवस्थापन क्षेत्रातील कंपन्यांना संधी निर्माण होतील.
मात्र, थेट सरकारी निधीवर अवलंबून राहिल्यामुळे सरकारच्या वित्तीय खर्चात वाढ होणार आहे. तसेच, 300 नवीन जागांवर (विमानतळ आणि हेलिपोर्ट्स) काम करणे हे जमिनीच्या संपादनापासून ते पर्यावरणीय परवानग्यांपर्यंत अनेक आव्हाने उभी करू शकते. प्रादेशिक मार्गांची व्यावसायिक व्यवहार्यता अजूनही सिद्ध झालेली नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांना या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर आणि वेळेवर लक्ष ठेवावे लागेल.
