नाशिकमधील सुरक्षा प्रकरणानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आता लहान शहरे आणि टियर-2, टियर-3 शहरांमधील आपला विस्तार थांबवणार आहे. कंपनीचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, कमी कर्मचारी असलेल्या 'सब-ऑप्टिमल' सेंटर्समध्ये विस्तार टाळला जाईल, ज्यामुळे जोखीम कमी होईल. या निर्णयामुळे कंपनीच्या प्रॉपर्टी पोर्टफोलिओमध्ये मोठा बदल अपेक्षित आहे.
लहान शहरांमधील सुरक्षिततेला प्राधान्य
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आपल्या विस्तार धोरणाचे पुनरावलोकन करत आहे. कंपनी आता टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये 'सब-ऑप्टिमल' (sub-optimal) सेंटर्स सुरू करणे टाळणार आहे. नाशिकमधील कंपनीच्या बीपीओ ब्रांचमध्ये झालेल्या एका मोठ्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विशेष तपास पथक (SIT) आणि राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) चौकशी सुरू केली होती.
कंपनीच्या 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी शेअरधारकांच्या चिंतांवर भाष्य केले. त्यांनी नाशिकच्या घटनेतून शिकलेला धडा सांगताना सांगितले की, खूप लहान सेंटर्स (उदा. 100-200 कर्मचारी) सांभाळणे अवघड आहे. 'इतक्या कमी लोकांसाठी सेंटर सुरू करणे आणि त्याचा पसारा वाढवणे योग्य नाही, तसेच यामुळे जोखीम अनावश्यकपणे वाढते,' असे ते म्हणाले. कंपनी आता आपली उपस्थिती एकत्रित करण्यावर भर देणार असून, भविष्यातील विस्तार योजनांची बारकाईने तपासणी केली जाईल.
