गुंतवणूक पाच वर्षे उशिरा सुरू केल्यास तुमच्या निवृत्तीच्या निधीवर (Retirement Corpus) मोठा परिणाम होऊ शकतो. वयाच्या २५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास ६.४ कोटींचा निधी उभा राहू शकतो, तर पाच वर्षांच्या उशिरामुळे हा आकडा थेट ३ कोटींनी कमी होतो.
दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणुकीची रक्कम किती आहे, यापेक्षा ती किती लवकर सुरू केली आहे, हे जास्त महत्त्वाचे ठरते. एक उदाहरण घेतल्यास, जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी दरमहा ₹१०,००० ची SIP सुरू केली आणि त्यावर १२% परतावा (Annualised Return) गृहीत धरला, तर वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत तुमच्याकडे सुमारे ₹६.४ कोटी जमा होऊ शकतात. मात्र, जर तुम्ही हीच गुंतवणूक वयाच्या ३० व्या वर्षापासून सुरू केली, तर हा निधी ₹३.५ कोटींवर खाली येतो. म्हणजे केवळ पाच वर्षांच्या उशिरामुळे तुम्ही ₹३ कोटींचे नुकसान करता, तर मुद्दल रक्कमेतील फरक फक्त ₹६ लाखांचा असतो.
उशिरा सुरुवात करण्याचा फटका
जेव्हा गुंतवणूक उशिरा सुरू होते, तेव्हा समान ध्येय गाठण्यासाठी गुंतवणुकीचा बोजा वाढतो. वयाच्या ३० व्या वर्षी ₹६.४ कोटींचे टार्गेट गाठण्यासाठी तुम्हाला दरमहा गुंतवणुकीची रक्कम वाढवून ₹१८,००० ते ₹१८,५०० करावी लागेल. म्हणजेच, गमावलेला वेळ भरून काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या बचतीत ८०% वाढ करावी लागते. गुंतवणुकीचा कालावधी जसजसा कमी होतो, तसतशी 'कंपाउंडिंग'ची ताकद कमी होत जाते. वयाच्या ३५ व्या वर्षी सुरू केल्यास ₹१.९ कोटी, तर वयाच्या ४५ व्या वर्षी सुरू केल्यास केवळ ₹५० लाख इतकाच निधी जमा होऊ शकतो.
महागाई आणि मार्केट रिस्क
वरील सर्व आकडे १२% परताव्यावर आधारित आहेत, पण शेअर बाजार कधीही रेषेत चालत नाही. इक्विटी आणि म्युच्युअल फंडमध्ये बाजारातील चढ-उतार, आर्थिक धोरणे आणि क्षेत्रनिहाय मंदी असे धोके असतात. शिवाय, आजचे ६.४ कोटी रुपये ३० वर्षांनंतर महागाईमुळे आजच्यासारखे मूल्य राखतीलच असे नाही. त्यामुळे केवळ आकड्यांकडे न पाहता महागाईचा विचार करून आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
उशिरा सुरुवात करणाऱ्यांसाठी 'स्टेप-अप SIP'
जर तुम्ही लवकर सुरुवात केली नसेल, तर 'स्टेप-अप SIP' (Step-up SIP) हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये दरवर्षी तुमच्या पगारवाढीनुसार गुंतवणुकीची रक्कम १०% ते १५% ने वाढवावी. तुमची आर्थिक स्थिती आणि ध्येय यांचा सतत आढावा घेतल्यास, उशिरा सुरुवात करूनही तुम्ही निवृत्तीसाठी मोठा निधी उभा करू शकता.
