अनेक लाइफ इन्शुरन्स कंपन्या आता 'इन्स्टंट क्लेम पेआउट'ची सुविधा देत आहेत, पण ही रक्कम फायनल सेटलमेंट नसून केवळ एक ॲडव्हान्स आहे. जर क्लेम रिजेक्ट झाला, तर कंपन्या ही रक्कम परत मागू शकतात, ज्यामुळे कुटुंबावर संकट येऊ शकते.
सध्या अनेक भारतीय विमा कंपन्या 'इन्स्टंट क्लेम पेआउट'ची जाहिरात करत आहेत. ज्यामध्ये मृत्यूनंतर कुटुंबाला २४ ते ४८ तासांत काही रक्कम तातडीने दिली जाते. ही सुविधा अंत्यसंस्कार, हॉस्पिटलची बिले किंवा तातडीच्या खर्चासाठी उपयुक्त वाटत असली तरी, ती केवळ एक आगाऊ रक्कम (Advance) असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
क्लेम रिजेक्ट झाल्यास काय?
विमा कंपनीला प्रत्येक डेथ क्लेमची सखोल चौकशी करणे कायदेशीररित्या बंधनकारक असते, विशेषतः पहिल्या ३ वर्षांतील पॉलिसींच्या बाबतीत. जर कंपनीच्या तपासात माहिती लपवल्याचे (Non-disclosure) किंवा अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळले, तर क्लेम रिजेक्ट केला जातो. अशा वेळी, कंपनीने दिलेली 'इन्स्टंट' रक्कम तुम्हाला परत करावी लागू शकते. दुःखाच्या काळात आर्थिक संकट आणि कंपनीची वसुली यामुळे कुटुंबावर मोठा ताण येऊ शकतो.
अटी आणि शर्तींकडे लक्ष द्या
जाहिरातीत दिसणारा २४-४८ तासांचा कालावधी सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतरच सुरू होतो. बऱ्याच पॉलिसींमध्ये ही सुविधा सुरू होण्यासाठी १ ते ३ वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. तसेच, काही पॉलिसींमध्ये 'सम अश्युअर्ड'ची एक किमान मर्यादा असते. त्यामुळे, केवळ विम्याच्या पैशांवर अवलंबून न राहता, कुटुंबासाठी एक स्वतंत्र आपत्कालीन निधी (Emergency Fund) असणे केव्हाही उत्तम, जेणेकरून कोणत्याही अनिश्चिततेचा फटका बसणार नाही.
